Saturday 11 January 2014

सिध्दरामेश्वरांचा सच्चा वारकरी...!


सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वरांमुळे सोलापूरची एक वेगळीच ओळख आहे. मंदिरात गेलं की, खूप प्रसन्न आणि उत्साही वाटतं. शांत वातावरण, चहुबाजूंनी पाणी आणि पुरातन मंदिर असूनही असलेली स्वच्छता यामुळे मंदिराचे पावित्र्य अधिकच जाणवतं. दरवर्षी १४ जानेवारी अर्थात संक्रांतीच्या दिवशी यात्रा भरते. सोलापूरच्या या गड्डा यात्रेत पांढरीशुभ्र वस्त्र परिधान केलेली मंडळी सर्व जातीभेद, धर्मभेद विसरून एकत्र येतात, हे यात्रेचं वैशिष्ट्य. हीच गड्डा यात्रा लहानपणापासून डोळ्यांत साठवून तीच चित्रांव्दारे कुंचल्यातून दाखविणारे मूळचे सोलापूरचेच असलेले पण सध्या मुंबईत वास्तव्य असलेले जॉन डग्लस आहेत. पंढरीच्या वारीप्रमाणेच तेही दरवर्षी सिध्दरामेश्वरांची यात्रा न चुकता करतात.
सध्या ते मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेचे धडे देतात. जॉन डग्लस सरांचा जन्म सोलापूरचा. सरांना चित्रकलेची लहानपणापासून आवड होती. ते धर्माने ख्रिश्चन हे वेगळे सांगायला नको. पण, विशेष गोष्ट अशी की धर्माने ख्रिश्चन असूनही मित्रांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जायचे. या संघामध्ये त्यांनी अनेक महाभारतातल्या-रामायणातल्या कथा ऐकल्या. कदाचित सांगणाऱ्याचे वैशिष्ट्य असेल ज्यामुळे या कथांमधील व्यक्तिरेखा, घटना, वास्तू कशा असतील याची कल्पना डोळे आणि मन करू लागले आणि इथेच खऱ्या अर्थाने चित्रांची चौकट मनाने पकडायला सुरवात केली.
जॉन सरांच्या मते एखादी कला अशीच निर्माण होत नाही. कवी मनावर आघात झाल्यावर कवितेची निर्मिती होते. त्याचप्रमाणे त्यांच्याही मनात सोलापूरबद्दल या जन्मभूमीबद्दल सिध्दरामेश्वरांबद्दल आपुलकी जोडलेली आहे. ८५० वर्षाची परंपरा असलेली पण कुठेतरी दडलेली लोकांच्या मनात नजरेत न आलेली एक संस्कृती आहे. जी पंढरीच्या वारीइतकीच महत्त्वाची आहे. सिध्देश्वर आणि त्यांचे एक अतूट नाते झाले आहे. सिध्दरामेश्वरांची ६८ शिवलिंगे स्थापन केली. या शिवलिंगाभोवती जवळ जवळ एक ते दोन लाख भाविक परीट घडीची पांढरीशुभ्र वस्त्रे परिधान करून सारं काही विसरून प्रदक्षिणा घालतात. ही परिक्रमा, मिरवणूक सकाळी साडेसातला आरंभ होऊन पहाटे साडेतीनला तिची सांगता होते. दरवर्षी संक्रांतीच्या आधी सोलापूर शहरात निघणाऱ्या श्री. सिध्दरामेश्वरांच्या या गड्डा यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून या यात्रेसाठी जमणाऱ्या तमाम भाविकांच्या भावनांना जॉन डग्लस यांनी जिवंत केले आहे. जॉन सर  सोलापूरचे असल्याने या यात्रेचे सौंदर्य त्यांनी रंगात अचूक पकडले आहे. गड्डा यात्रेतील विविध पैलू वेगवेगळ्या व्यक्तिरेखा चित्रित करून लोप पावत असलेल्या संस्कृतीला पुन्हा एकदा दृष्टीक्षेपात आणण्याचा प्रयत्न आपल्या कुंचल्याव्दारे सरांनी केला आहे. तर अशा या संस्कृतीचे लोक जातीभेद, वर्णभेद, रंगभेद विसरून एकाच पांढऱ्या रंगाच्या वस्त्रात जमून मनोभावे शिवलिंगाला तेलाचा अभिषेक करतात. अनवाणी पायाने चटके खात, ठेचकाळत ते पदयात्रेत सहभागी होतात.
लहान असताना जॉन डग्लस वडिलांबरोबर चर्चमध्ये `प्रे`साठी जायचे. सोलापूरचा हा चर्च जवळ-जवळ एकशे दहा वर्ष जुना आहे. त्याच्या भिंतीवर खूप मनोवेधक चित्रं चितारलेली आहेत. ही भित्तीचित्रं कुठंतरी जॉन यांच्या बालमनावर परिणाम करत होती. सरांच्या बहिणीला इंटरमिडीयट ड्राईंगमध्ये गोल्ड मेडल मिळाले होते. तिनेच सरांना या क्षेत्रात मदत केली. प्रोत्साहन दिले. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत तितकेसे लक्ष दिले गेलो नाही. पाचवी ते दहावी या शालेय कालावधीत हा मार्ग निश्चित झाला, असे म्हणायला हरकत नाही. दिवाळी, ख्रिसमससारख्या सणांच्या निमित्ताने होणाऱ्या स्पर्धांमध्ये विशेष वाव मिळाला. शालेय शिक्षण छत्रपती शिवाजी शाळेमध्ये व प्राथमिक शिक्षण सेवासदन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेमध्ये झाले.
या शाळांमध्ये अभ्यासाबरोबरच इतर कलागुणांनाही मोठ्या प्रमाणावर वाव दिला जायचा. सरांना घडवले ते याच शाळांनी...त्यावेळचे शाळेचे मुख्याध्यापक ग.सा.पवार यांनी डग्लस सरांना घडविणारे प्रा.शहाजीराव घोरपडे हे आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. पण, प्रा.रविराज ओमणे मात्र आजही विद्यार्थी घडविण्याचा वसा जपत आहेत.

जे.जे.स्कूल ऑफ आर्टसच्या वेटिंग लिस्टवर सरांचा क्रमांक सहावा होता. सर ठाण्याला बहिणीच्या घरी राहत असत. सरांना पूर्वीपासून मुंबईचं आकर्षण. मुंबईत आल्या आल्या सर्व प्रथम मनात भरली ती मुंबई स्टेशनची इमारत. मग, मुंबईतील व्यावहारिक दैनंदिन जीवनाचे सरांच्या मनातील एका कोपऱ्यावर वर्चस्व मिळविले. आणि सरांना विषय़ मिळाला. मुंबईतील व्यावहारिक दैनंदिन जीवन विषयावर अनेक चित्रे काढली. आणि छोटीशी फिल्म काढली. यात व्हिक्टोरिया घोडागाडीतून मुंबई नगरीला फेरफटका मारत असल्याचा आभास होतो. या चित्राला महाराष्ट्र सरकारचे पहिले पारितोषिक विद्यार्थीदशेतच मिळाले. याचबरोबर राज्य पुरस्कार विजेता चित्रकार म्हणून महाराष्ट्र शासनाने गौरवले. 

Thursday 24 October 2013

बस्स...! आवाज ही पहचान है...!








महाराष्ट्रात आज प्रत्येक एसटी स्थानक, आजूबाजूंच्या दुकानात, हॉटेलमध्ये, चहाच्या टपरीवर त्यांच्या गाण्यांशिवाय दुसरे काही ऐकूच येत नाही... खेडय़ापाडय़ात असा एकही मराठी रिक्षाचालक, टॅक्सी ड्रायव्हर नाही जो प्रवासात त्यांच्या धमाल गाण्यांशिवाय गाडी चालवूच शकत नाही... गावामध्ये लाऊडस्पिकरवर त्यांच्या गाण्यांशिवाय लग्न होत नाही... गावोगावी जत्रेमध्ये त्यांचाच आवाज सर्वत्र घुमत असतो. भले त्यांची गाणी लोकसंगीत बाजाची असतील, भले त्यांची गाणी ‘दुहेरी अर्थाची’ असतील... लोकांनी त्यांना आपल्या पसंतीची पावती दिली आहे. जरी अभिजन वर्गाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असले, तरी रसिकांनी मात्र त्यांना `आपलंच` मानलंय. राजाश्रयापासून ते कायम वंचित राहिले आहेत. शिंदे कुटुंबातील एक नव्हे तब्बल १५ जण गायक आणि संगीतकार आहेत. पण, `आवाज` मात्र एकच आहे. शिंदे परिवारातल्या चौथी पिढीचं खणखणीत नाणं आजही वाजत आहे ते निव्वळ लोकाश्रयावर
मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचं हे शिंदे घराणं. मंगळवेढ्यातील भीमनगरमध्ये आजही त्यांचं घर आहे. लोकगायक आणि संगीतकार स्व.प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणी आजही मंगळवेढेकर जाग्या करतात. मला चांगलं आठवतंय, आमच्या घरीही खरखरत्या लाऊडस्पीकरवर प्रल्हाद शिंदे यांचं `श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा` सुरु झालेलं असायचं. आमच्या गल्लीतला गणपती आणि प्रल्हाद शिंदे यांची गाणी असं नादमय समीकरण होतं. आजही गावागावांत पूजेची तयारी होते तेव्हा प्रल्हाद शिंदे यांचा खडा आवाज तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरय्या रे...चरणी ठेवितो माथा`, चिक मोत्याची माळ...गणपती माझा नाचत आला...अशी गाणी असतात. `आता तरी देवा मला पावशील का...? सुख ज्याला म्हनत्यात ते दावशील का? या गाण्यातून काळजात कळ उमटते. काळाच्या ओघात आता खूप बदल झाले आहेत. झंकार बीट्स आले नि गेले. डिस्कोही गेला. थर्टीसिक्स नॉनस्टॉपला मागे टाकणारी फिफ्टीसिक्स नॉनस्टॉप गणेशगीते आली. तरीही, प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या गाण्यांनीच गावांमध्ये अजूनही त्यांची `मोनोपली` कायम ठेवली आहे.
मूळचे मंगळवेढ्याचे शिंदे घराणे असले तरी सध्या ते खूप वर्षापासून मुंबईतच वास्तव्यास आहेत. शिंदे घराण्याची चौथी पिढी लोकसंगीताची सेवा करत आहे. लोकगायक आनंद शिंदेंची आजी सोनाबाई त्याकाळी फार चांगला तबला वाजवायची आणि आजोबा भगवान शिंदे पेटी वाजवायचे. चौकाचौकात त्यांची भजने खूप चांगली रंगायची. सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद ही त्यांची तीन मुले. तिघेही संगीतक्षेत्रात. सदाशिव हे एस.बी. शिंदे उर्फ किसन शिंदे नावाने
गायक म्हणून प्रसिद्ध. नारायण हे एचएमव्ही कॅसेट कंपनीत तबला आर्टिस्ट म्हणून नोकरीला होते. प्रल्हाद शिंदेंना तीन मुले.. आनंद, मिलिंद आणि दिनकर. आनंद शिंदेला तीन मुले हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श तर मिलिंद शिंदेला चार मुले मयूर, अंकूर, मधूर आणि स्वरांजली. दिनकर शिंदेला चार मुले सार्थक, समर्थक, मनोरथ आणि संविधान. विशेष म्हणजे घरातली सगळीचं गायक आणि संगीतकार मंडळी. आताची शिंदे घराण्यातील चौथी पिढी उच्चशिक्षित असली तरीही त्यांनी कलेची सेवा सोडली नाही.
गायक आनंद शिंदे म्हणाले, ``संगीत घरातच असल्यानं लहानपणापासूनच आम्ही वडिलांबरोबर कोरसमध्ये गायला जायचो. तेव्हा कव्वालीच्या मुकाबल्यांचा फार जोर असायचा. नववीला नापास झाल्यावर वडिलांनी हातात तबला दिला आणि माझे शिक्षण तिथेच थांबले. वडिलांचा मार खात खात मी तबला शिकलो. मिलिंद बघूनच शिकला. आम्ही दोघे भाऊ लहान असतानाच कव्वाली मुकाबल्यामध्ये ढोलक वाजवायचो. वडिल कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले की मुंबईचे कार्यक्रम आम्ही करायचो. वडिलांनी त्यानंतर एचएमव्हीसाठी खूप काम केलं. दरवेळी रेकॉर्डिगला ते आम्हा भावंडांना घेऊन जायचे. त्यामुळं आम्हा दोघा भावंडांवर वडिलांच्याच गाण्याची छाप आहे.``
लोकगायक-संगीतकार प्रल्हाद शिंदे यांची लोकसंगीताची परंपरा त्यांचा मोठा मुलगा म्हणजे आनंद शिंदेने तितक्याच जोमाने सुरू ठेवली आहे. ‘जवा नवीन पोपट हा लागला मिठू-मिठू बोलायला’ पासून‘कोंबळी पळाली’ पर्यंतचा आनंद शिंदेचा प्रवास थक्क करणार आहे. आवाजाचा वेगळा बाज, टिपेचा आवाज, गाताना हेल काढण्याची सवय, दुहेरी अर्थाची गाणी... आनंद शिंदेनं लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. ते फक्त लोकगीतं गात नाही तर अभंग, भक्तीसंगीत, कव्वाली, भावगीतंही चांगल्याप्रकारे गाऊ शकतो हे आनंद शिंदेनं कॅसेटच्या तुफान विक्रीतून दाखवून दिले आहे. `जवा नवीन पोपट हा लागला मिठू-मिठू बोलायला` या गाण्यानं तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली. कॅसेट विक्रीचे सर्व रेकॉर्ड `ब्रेक` केले. तब्बल १६ लाख विक्रमी कॅसेटची विक्री झाली. १९८६ मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या गाण्याची नोंद झाली. म्हणून आनंद शिंदेला `पोपट` भलताच भावला आहे. आनंद शिंदेकडे दोन-तीन गाडय़ा आहेत. मात्र, एमएच-डब्ल्यू-४८८९ ही सुझुकी कंपनीची बाईक त्यांनी आजही जपून ठेवली आहे. कारण, पोपटाच्या गाण्यावर खूश होऊन व्हीनस कंपनीने ती भेट दिली आहेत्यांनी मंगळवेढ्याच्या बंगल्यावर आणि त्यांच्या गाडीवर पोपटाची चित्रे लावली आहेत. आनंद शिंदे मंगळवेढ्यात येतात, तेव्हा बाजारात फिरताना बहुतांश मंडळी मोठ्या आवाजात मुद्दाम पोपटाचे गाणे लावतात. आनंद शिंदे फक्त स्मितहास्य करत लोकांना नमस्कार करतात.
आनंद शिंदे यांनी गाण्यांच्या जोरावर मोठे नाव आणि पैसा मिळविला. पण, समाजासाठी काय केले? असे लोक टोमणे मारतात. तेव्हा त्यांनी ‘सोनियाची उगवली सकाळ, जन्माला आले भीमबाळ’ आणि ‘वाणी ऐका बुद्धाची’, `ना भाला ना, बर्ची ना घाव पाहिजे...आणि तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे...` या कॅसेट काढल्या आणि तमाम दलित समाजानं आनंद शिंदेला डोक्यावर घेतले.  `महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला, बोला हर हर महादेव बोला...` अशी शिवगीते आणि भीमगीते गाऊन लोकांची मने जिंकली आहेत. परंतु, काही बाबतीत आनंद शिंदे स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवितात. लोकगायक ‘प्रल्हाद शिंदेंची या महाराष्ट्राने कायम उपेक्षा केली. बाप्पा मोरया रे, जगी जीवनाचे सार, चल गं सखे पंढरीला, ऐका सत्यनारायणाची कथा अशी अजरामर गाणी माझ्या वडिलांनी गायली आहेत. महाराष्ट्राच्या संगीतविश्वात त्यांचे फार मोठे योगदान आहे. कित्येक रसिकांनी प्रल्हाद शिंदे यांची गाणी ऐकली आहेत. पण, त्यांना ही गाणी प्रल्हाद शिंदेचीच आहेत, हे माहिती नाही. गायकापेक्षा गाणी हिट होतात, हे ऐकून मनाला यातना होतात.
कितीही सूर मिळवावा
पण सूर हा लागत नाही
कितीही ऐकली तरी भूकही भागत नाही
कथा सत्यनारायणाची,खोटं हे सांगत नाही
आणि त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय
तो पंढरीचा विठोबा जागत नाही’
हा शेर ऐकवून आनंद शिंदे आपलं दु: ख व्यक्त करतो. आतापर्यंत सुमारे १२ हजार गाणी तर २५० चित्रपटांचं पार्श्वगायन शिंदे यांनी केलं आहे. पण, शिंदे घराण्याबद्दल कोणीच बोलत नाही. त्यांच्याबद्दल कधीच कोणी वर्तमानपत्रात छापत नाही. कारण, त्यांना मार्केटिंगचं तंत्र अवगत नाही. त्यांना ‘पीआर’ म्हणजे काय तेच कळत नाही.
आनंद शिंदेंची तीनही मुले गात असली तरी आदर्श शिंदेकडून त्यांच्या खूप अपेक्षा आहेत. कलाकाराला जात-धर्म नसतो. त्याने फक्त कलेची सेवा करायची असते, हे आनंद शिंदेंचे सूत्र आहे. आदर्श शिंदेनं दुनियादारी या चित्रपटात `देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही...सांगा कुठं ठेऊ माथा कळनासं काही...` गाणं गायलं आहे. ते गाणं सर्वाधिक लोकप्रिय असून यू ट्युबवरही सर्वाधिक हिटस त्याच गाण्याला आहेत. `मनसे`चं टायटल सॉंग, नारबाची वाडी, `वंशवेल`मध्येही आदर्शने गाणी गायली आहेत. आदर्शच्या तुफान गाण्यामुळे मुंबईच्या षन्मुखानंद सभागृहात गीत गाताना लोकगायक प्रल्हाद शिंदेंनी आदर्शला हातातले घड्याळ काढून बक्षीस दिले.
माणुसकीचा महासागर
प्रल्हाद शिंदें परिस्थितीने गरीब असले तरी दातृत्व आणि माणुसकीच्या बाबतीत सर्वोच्च स्थानी होती. याचे कित्येक दाखले त्यांची मित्रमंडळी देतात. एकदा सोलापूरहून मुंबईला रेल्वेने प्रल्हाद शिंदे प्रवास करत होते. रेल्वेमध्ये भीक मागणारी लहान मुले होती. त्यांनी प्रल्हाद शिंदेंना पैसे मागितले. परंतु, प्रल्हाद शिंदेंकडे पैसे नव्हते. मंगळवेढ्याहून येताना त्यांनीच मित्रांकडून पैसे उसने घेतले होते. परंतु, या गरीब मुलांना पैसे दिले पाहिजेत, ही भावना त्यांच्या मनात होती. त्यांनी रेल्वेमध्येच सुरेल गाणी गायला सुरवात केली. प्रवाशांनी प्रल्हाद शिंदेंना पैसे दिले. त्यांनी जमलेले सर्व पैसे त्या गरीब भीक मागणाऱ्या मुलांना दिले. रेल्वेत भीक मागू नका, जा आता इथून अभ्यास करा..अशी प्रेमळ धमकी दिली. मुलांनी आनंदाने धूम ठोकली. अंध लोकांसाठी प्रल्हाद शिंदे चॅरिटी शो करायचे. त्यांना पंखा, जीवनावश्यक वस्तू द्यायचे. पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप महत्त्वाची आहे, असे ते मुलांना सांगायचे. दुसरा एक किस्सा असा की, विजय सरतापे नावाच्या गृहस्थाच्या नातेवाईकाला दवाखान्यासाठी पैशांची अडचण होती. पैसेच कुठूनच जमा होत नव्हते. शेवटी त्यांनी प्रल्हाद शिंदेंना सांगितले. प्रल्हाद शिंदेंनी शेजारच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सुरु होते. तिथे जाऊन भजन व गाणे गायले. लोकांनी आनंदाने पैसे जमा करून प्रल्हाद शिंदेंना दिले. प्रल्हाद शिंदेंनी ते पैसे विजय सरतापे यांनी दिले.
गाणं वाजतच राहिलं पाहिजे
प्रल्हाद शिंदेंना वाढत्या वयामुळे शारिरिक त्रास सुरु झाला. त्यांना हृदयरोगाचा त्रास होता. त्यात त्यांना पाच वेळा हार्ट ऍटॅक आला. गाण्यांचे कार्यक्रम त्यांनी सुरुच ठेवले होते पण, शेवटच्या श्वासापर्यंत गाणे गात राहिले. गाणं हाच माझा श्वास आहे, असे ते म्हणायचे. एवढं ते गाण्यांवर प्रेम करायचे.
`स्वरसूर्य` तळपतच राहील
प्रल्हाद शिंदें यांच्या कार्याची दखल घेऊन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठानं पाठ्यपुस्तकात स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा कार्याचा गौरव केला आहे. कल्याणमध्ये प्रल्हाद शिंदे यांचा पुतळा बसविला आहे. गोरेगाव-लिंक रोडला प्रल्हाद शिंदे मार्ग असे नामकरण केले आहे. तर सोलापूरमध्येही प्रल्हाद शिंदे मार्ग तसेच मंगळवेढ्यात त्यांच्या नावाचे मोठे प्रवेशव्दार उभारले आहे.
तोता मैना ते चिकनी चमेली...
आनंद शिंदे यांची गाणी बॉलीवूड दिग्दर्शकांच्यादेखील आवडीचा विषय झाली. त्यांचे `पोपट`चे गाणे हिट झाल्यावर १९८८ मध्ये `पाप की दुनिया`मध्ये `मै तेरा तोता, तू मेरी मैना` गाणे कॉपी करण्यात आले. प्रसिद्ध गायक किशोरकुमार यांनी ते गाणे गायले होते. अलीकडच्या काळात `कोंबडी पळाली…` या गाण्याचे `चिकनी चमेली…` हे हिंदी व्हर्जन लोकप्रिय आहे. संगीतकार अजय-अतुल यांनी आनंद यांच्याकडून गाणे लिहून घेतले होते. `हाताला धरलंय या...म्हणतीय लगीन ठरलंय या...` या गाण्याचे हिंदी व्हर्जन लवकरच येणार आहे.
अनेक भाषेत गायन
आनंद शिंदे यांनी तमिळ, उर्दु, पंजाबी अशा मुख्य आठ भाषेत गाणी गायली आहेत. आनंद शिंदेंनी एका दिवसात तब्बल १३ गाणी गायली आहेत. हा एक विक्रमच आहे. मुंबईचा पोरगा, झाडीची पोरगी हे माठ आदिवासी गाणेही गायले आहे. जवा नवीन पोपट हा हे गाणे हिट झाल्यावर महाराष्ट्रात वर्षभरात तब्बल एक हजार प्रयोग केले. प्रल्हाद शिंदे यांची गाणी मी गातो तसेच माझा मुलगा आदर्शची गाणीही मी गातो, हे माझे भाग्य असल्याचे आनंद शिंदे आनंदाने सांगतात. आजघडीला सर्वात बिझी गायक म्हणून आनंद शिंदेंकडे पाहिले जाते. मंगळवेढ्याच्या इंग्लिश स्कूल प्रशालेसाठी त्यांनी नुकताच चॅरिटी शो केला. त्यालाही लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता.
आनंद शिंदेंना `नो एंट्री`
सांगली, पुणे आणि सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये आनंद शिंदेंना वेगळे नियम व अटी आहेत. त्यांची उडत्या चालीवरची गाणी भन्नाट आणि लोकप्रिय असल्यामुळे प्रेक्षकवर्ग शिट्या वाजवून बाकड्यांचे नुकसान करतात, अशी तेथील थिएटरच्या व्यवस्थापकाचे म्हणणे आहे. थिएटर हाऊसफुल्ल झाल्यामुळे गर्दीला आवरणे कठीण जाते. त्यामुळे हे नियम लावावे लागतात.
फॅन क्लब अफलातून...
सोलापूरसह सबंध महाराष्ट्रात त्यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. कोणी बनियनवर पोपटाचे चित्र काढतो. कुणी हातावर बॅन्ड, कुणी छातीवर पोपटाचे टॅटू गोंदतो. कोणी दुचाकीवर नंबरप्लेटवर पोपट काढतो. पोपट हा त्यांचा एक `ट्रेडमार्ग`च झाला आहे. लोकांचे प्रेमच आपल्यासाठी ऍवॉर्ड असल्याचे आनंद शिंदे सांगतात.
शिंदेंना टोलमाफी
महाराष्ट्रात सर्व वाहनांना टोल आकारला जातो. मात्र, आनंद शिंदे यांच्या गाडीला टोलमाफी आहे. गाडीवर पोपटाचे चित्र पाहून टोलमाफ केला जातो. उलट, कर्मचारी माझ्यासोबत फोटो काढतात. लोकांचं प्रेमच हे सगळं दुसरं काय म्हणायचं? असे ते नम्रपणे म्हणतात.
काळानुसार बदल आवश्यकच
लोकगायक प्रल्हाद शिंदे हे लोकगीते, कव्वाली, भजन, गणपती गीते, विठ्ठलाची गीते, भीमगीते गायचे. त्यांचा काळ तसा होता. त्या काळात त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर आनंद-मिलिंद शिंदे यांनी उडत्या चालीवरची गाणी गाऊन जनमानसावर अधिराज्य गाजवले. दादा कोंडके यांचा तो काळ होता. त्यावेळी दादा कोंडके यांचाही एक वेगळा चाहता वर्ग होता, किंबहुना आजही तो कायम आहे. त्यामुळे ज्यांना जे आवडते ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आता आनंद शिंदे यांचा मुलगा आदर्श शिंदे युवापिढीला आवडेल अशी गाणी गातोय. दुनियादारीमधील `देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही...`हे गाणे प्रचंड लोकप्रिय आहे. शिंदे कुटुंबिय फक्त `व्दिअर्थी` गाणारे गायक आहेत, अस्सं काही नाही. लोकांना जे आवडतं ते आम्ही करतो. काळानुरुप योग्य ते बदल आवश्यकच असल्याचे आनंद शिंदे यांचा मुलगा हर्षद शिंदे सांगतो.
शिंदे घराण्याच्या रक्तातच गाणं आहे
लोकगायक स्व.प्रल्हाद शिंदे यांचे मंगळवेढ्यातील मार्गदर्शक ह...तात्यामहाराज ऊर्फ बुवा जगताप यांनी प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणी सांगितल्या. प्रल्हाद शिंदे खूप गुणी होता. त्याचा आवाज खूप गोड होता. तो गाताना पथ्ये वगैरे पाळत नसायला. कधी भजी, जिलेबी असे तेलकट पदार्थ खायचा. पण, एकदा का स्टेजवर चढला की मग सर्वांना जिंकायचा. मुंबईतील पानबाजार येथे लीला कुलकर्णी आणि प्रल्हाद शिंदे यांच्यात गाण्यांची जुगलबंदी होती. उडत्या चालीची गाणी सादर करून पठ्ठ्यानं (प्रल्हाद शिंदे) सर्वांची मने जिंकली. मंगळवेढ्याला त्याचे येणे-जाणे होते. बसच्या तिकिटाला पैसे नसले की माझ्याकडून तो पैसे घ्यायचा. जेवायला, गप्पा मारायला तो माझ्याकडेच यायचा. आताही त्यांची मुले आनंद-मिलिंद दोघेही येतात. माझा आशिर्वाद घेतात. प्रल्हाद शिंदेंच्या नंतरही त्यांची मुले अजूनही नम्र आहेत. त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत, यातच त्यांचा सगळा काही मोठेपणा आहे. प्रल्हाद शिंदेंनी प्रेमापोटी माझ्यावर तीन गाणी रचून गायिली आहेत. संत दामाजी मंदिरात अजूनही प्रल्हाद शिंदेंची गाणी गायली जातात.
चळवळ आणि शिंदे घराणे
लहानपणीच परिस्थितीचे चटके बसल्याने चळवळ जागृत ठेवण्याचं काम शिंदे घराण्याने केले आहे. मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्याच्यावेळी शिंदे परिवाराने गाण्यांच्या माध्यमातून लोकप्रबोधन केले. सामाजिक, प्रबोधनात्मक अनेक गीते गायिली. लोकभावना जिवंत ठेवण्याचे काम शिंदे परिवाराने केले. भीमजयंतीला हमखास आनंद-मिलिंद यांची गीते असायची. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ते दैवत मानतात. लोकशाहीर वामनदादा कर्डक, विठ्ठल उमप यांच्याशीही त्यांचे नाते जिव्हाळ्याचे होते. तीच परंपरा आता त्यांची मुलेही पुढे करीत आहेत.
व्हर्सटाईल लोकगायक
प्रल्हाद शिंदे यांची परिस्थिती खूपच हलाखीची होती. शेजारच्या गावात बैलगाडीने जाऊन ते कार्यक्रम करायचे. मिळेल ते खायचे. हातात घुंगरू बांधून तबला वादन करायचे. त्यांनी कोणतेही गायनाचे शिक्षण घेतले नव्हते. पंढरपूरची वारी त्यांच्या गाण्यांशिवाय पूर्ण होत नव्हती. मंगळवेढा तशी संतांची भूमी. संत दामाजीपंत, चोखामेळा, टीकाचार्य, स्वामी समर्थ, बसवेश्वर, कान्होपात्रा यांच्यासह अनेक संतांच्या पावनस्पर्शानं पुनीत झालेल्या या भूमीने मला खूप दिलं, अशी त्यांची भावना होती. मंगळवेढे भूमी संतांची...पाऊले चालती पंढरीची वाट, चल गं सखे...चल गं सखे पंढरीला, चंद्रभागेच्या तिरी, उभा विटेवरी...जैसे ज्याचे कर्म तैसे...धरीला पंढरीचा चोर...दर्शन दे रे...दे रे भगवंता...अशी एकाहून एक सरस गाणी गायिली. भावगीते, भक्तीगीते, लोकगीते, भीमगीते, कव्वाली, क्लासिकल असा व्हर्सटाईल लोकगायक होता.
`स्वाभिमानी` प्रल्हाद शिंदे
लोकगायक स्व.प्रल्हाद शिंदे खूप स्वाभिमानी होते. त्यांची घरची परिस्थिती खूप हलाखीची, गरिबीची असली तरी स्वाभिमान त्यांनी कधी गहाण ठेवला नाही. गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांनी त्यांना खास एकदा भेटीचे निमंत्रण दिले. मंगेशकर कुटुंबियांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. परंतु, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे लतीदीदींनी गायले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे दैवत आहे. माझ्या दैवताचे गाणे लतादीदींनी गायले नाही, म्हणून त्यांनी लतादीदींचे भेटीचे निमंत्रण नाकारले. हा आंबेडकरी `स्वाभिमानी बाणा` प्रल्हाद शिंदेंनी दाखविला.
लोकगायक स्व.प्रल्हाद शिंदे प्रवेशव्दार
लोकगायक प्रल्हाद शिंदे यांनी मंगळवेढ्याचे नाव सर्वदूर केले. गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी लोकप्रबोधन केले. त्यांच्या कार्याची आठवण राहावी, यासाठी मंगळवेढ्यामध्ये शिवप्रेमी चौकात भलीमोठी कमान नगरपालिकेनं उभारून त्याला लोकगायक स्व.प्रल्हाद शिंदे प्रवेशव्दार असे नाव दिले आहे. यापुढेही स्व. प्रल्हाद शिंदे यांच्या नावाने समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा विचार असल्याचे नगराध्यक्ष धनंजय खवतोडे यांनी सांगितले.
अभ्यासापेक्षा गायनाची आवड
आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे हे दोघे मंगळवेढ्याच्या इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी. परंतु, लहानपणापासून ते वडिलांसोबत कोरसमध्ये गाणी म्हणायला जायचे. कव्वालीचे मुकाबले त्यांना फार आवडायचे. शाळेत मात्र त्यांचे मन फारसे रमले नाही. शाळेत अभ्यासापेक्षा गॅदरिंगमध्ये गाणी म्हणायला त्यांना आवडायचे, अशा आठवणी दलितमित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कदम यांनी सांगितल्या.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात...!
आनंद-मिलिंदचे मामा रंगनाथ तोंडसे सांगतात, ``आनंद-मिलिंद लहानपणापासून आमच्या घरी होते. लहानपणापासून दोघेही गाणी गायचे. प्रल्हाद शिंदेंची गाणीही दोघे गायचे. आनंद शिंदे पहिलीत असताना मोठ्यानं बाराखडी वाचायचा. गल्लीतली सगळं मुलं ती ऐकायची. पण, गाण्यांमध्येच त्याला विशेष आवड होती. प्रल्हाद शिंदे यांचं `गेला हरी कुण्या गावा…` हे गाणं भन्नाट गाजलं. एचएमव्ही कंपनीनं त्यांना `अभंगांचा बादशहा` म्हटले. भीमगीते, लोकगीते, कव्वाली, भजनं सर्व गाणं गायचे. मंगळवेढ्याशी त्यांचं नातं अजूनही कायम आहे. भीमनगरमध्ये आमचं घरं आहे. ढवळस रोडवर मोठा बंगला बांधला आहे.``
आनंद-विजयाची लगीनगाठ
आनंद शिंदे यांची पत्नीदेखील मंगळवेढय़ाची. १९८२ मध्ये सातवीत शिकत असतानाच त्यांचे आनंद यांच्यासोबत लग्न झाले. लग्नाच्यावेळी दोघांचेही वय लहान होते. शेजारी राहत असल्यामुळे विजयालाच घरची सून बनवायची, असे आनंदची आजी मुक्ताबाई यांचे मत होते. संगीताविषयी असणारे प्रेम विजया यांना ज्ञात असल्याने त्यांनी प्रोत्साहन देण्याचे काम केले. आनंद आजही प्रत्येक गाणे विजया यांना पहिल्यांदा ऐकवतो. त्यांचा होकार मिळाल्यावरच ते गाणे लिहिले जाते..
विजयाच्या रुपात लक्ष्मी आली...
लग्नाच्या वेळी आनंद यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती. त्यामुळे लग्नात विजया यांना नकली मंगळसूत्र दिले होते. पण ही परिस्थिती बदलायचीच असा त्यांचा निश्चय होता. जिद्दीच्या जोरावर त्यांनी आर्थिक संपन्नता आणली. आर्थिक सुबत्ता जशी आली तशी त्यांनी विजया यांना सोन्याच्या अनेक वस्तू भेट दिल्या. सोन्याने मडवण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले. पायातदेखील सोन्याची जोडवी घालण्यास दिली. यावर आनंद यांच्या नातेवाइकांनी सौभाग्यवती बाईने पायात सोने घालू नये. लक्ष्मी जाते, पतीलाही धोका असतो, असा सल्ला दिला. मात्र, आनंद यांनी विजया हीच माझी लक्ष्मी आहे. तिच्या रूपातच माझ्या घरी लक्ष्मी आली आहे, असे उत्तर दिले.
तिन्ही मुले उच्चशिक्षित
आनंद आणि विजया यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत. हर्षद अ‍ॅनिमेशन इंजिनिअर असून उत्कर्ष डॉक्टर (एमडी) आहे. सर्वात धाकटा असलेला आदर्श संगीत परंपरेचा वारसा पुढे घेऊन जावा, अशी शिंदे यांची अपेक्षा आहे. तिघाही मुलांना गायनाची आवड आहे. उत्कर्षने ‘पावर’ चित्रपटाला संगीत दिले. त्याचप्रमाणे उत्कर्ष आणि आदर्शने मिळून गौरव महाराष्ट्राचा, आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे थीम साँग तयार केले. शिंदे कुटुंबाचे नाव मुलांनी आणखी उज्‍जवल करावे, अशी या दांपत्याची आशा आहे. समाजाने खूप काही दिले त्याची परतफेड करण्याच्या उद्देशाने आनंद यांनी उत्कर्षला डॉक्टर बनवले. ‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली असून या संस्थेच्या माध्यमातून गरीब रुग्णांची मोफत सेवा केली जाते.