Thursday 5 November 2009

अनाथांचा नाथ.....पी.साईनाथ




आपण नेहमी अनेक जणांना भेटतो, पाहतो, बोलतो. पण, त्यातील काही माणसे आपल्या मनात नेहमी घर करून राहतात. का कुणास ठाऊक, अशा काही माणसांशी माझी WAVELENGTH जुळते, अशी माणसे मला नेहमीच ENERGETIC वाटतात. त्यांचा सतत सहवास घडावा, संवाद वाढावा, असंच मला वाटतं. त्यातली एक व्यक्ती म्हणजे पी. साईनाथ. पत्रकारितेचे धडे गिरवत असताना पी.साईनाथ यांच्याबद्दल खूप काही ऐकले होते. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची कधी वेळ आली नाही. पण, ती संधी परवा आली. त्यांनी मला थेट त्यांच्या घरीच बोलावलं. तीन खोल्यांचा फ्लॅट. त्यातल्या दोन खोल्या पुस्तकांनी गच्च भरलेल्या. घरात पुस्तके राहतात की माणसे? असा प्रश्‍न मला पडला. पण, सतत वाचन आणि चिंतन करणं हा जणू पी.साईनाथ यांचा स्थायीभावच असावा. पत्रकारितेच्या वर्गात शिकत असताना पी.साईनाथ यांच्या विकास पत्रकारितेवरील लेख मी वाचले होते. त्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील शोषित, वंचितांचे जीवन पी.साईनाथ यांनी मांडले होते. हा त्यांच्या संशोधनाचा विषय नव्हता तर चिंतनाचा विषय होता, हे मला दिसून आले. त्या अनुषंगाने मी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनीही विविध विषयांवर अगदी खुलेपणाने चर्चा केली. ग्रामीण पत्रकारितेपासून ते अगदी आताच्या पॅकेज पत्रकारितेबद्दल त्यांनी सडेतोड मते मांडली. पी. साईनाथ हे माजी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांचे नातू. पण, ती ओळख ते मुद्दामहून सांगत नाहीत. गोरगरिबांसाठी, उपेक्षित दलित, आदिवासी, कष्टकरी, महिला यांचे प्रश्‍न पोटतिडकीनं मांडले पाहिजेत. दलित, आदिवासी आणि महिलांना समाजात स्थान मिळाले पाहिजे. जातीयवाद नष्ट झाला पाहिजे. दलितांना हक्काची जाणीव करून दिली पाहिजे, तरच सामाजिक बदल होतीलही त्यांची आग्रही भूमिका. व्यावसायिक स्पर्धेच्या युगातही त्यांची भूमिका स्पष्ट, स्वच्छ आणि निर्भेळ आहे. पी. साईनाथ ह्युमन इंटरेस्ट असणाऱ्या स्टोरीजमध्ये ते अन्यायग्रस्त लोकांच्या गोष्टी लिहीत नाहीत तर त्या गोष्टीमधील लोकच आपल्याशी बोलत असतात, असं ते म्हणतात. त्यांच्या प्रत्येक रिपोर्टमध्ये मला रिसर्च क्वालिटी दिसली. मुळात पी. साईनाथ सत्याचा आग्रह धरणारे आहेत. त्यांच्या बोलण्यातून कुठेही आक्रस्ताळेपणा दिसला नाही. त्यांची बोलण्याची शैली शांत, गंभीर, टीका करणारी अभ्यासपूर्ण अशी मांडणी करणारी आहे. विषयाच्या मुळाशी जाऊन विषयाचा तळ गाठण्याची हातोटी आहे. निवडणुकीत झालेल्या पॅकेज पत्रकारितेबद्दल ते तीव्र नापसंती व्यक्त करतात. मी त्यांना प्रसारमाध्यमांची सामाजिक भूमिका बदलत चालली आहे का? असे विचारल्यावर ते म्हणाले, ""प्रसारमाध्यमांमध्ये नैतिकतेचे भान दिसत नाही. पेज थ्रीच नाही तर पेज एक ते चोवीस असा संपूर्ण पेपरच पेज थ्री आहे. माध्यमांना सामाजिक भान आहे की नाही, असा प्रश्‍न पडतो. Medium,messageआणि money या त्रिसुत्रीचा वापर निवडणुकीत कसा झाला हे त्यांनी सांगितले. थोर विचारवंत मार्शल मॅकलुहान म्हणतो, Medium Is the message (माध्यम हाच संवाद आहे.) पण, माध्यमातून कोणता संदेश दिला जातो, याचाही अभ्यास व्हायला हवा, असा साईनाथ सांगतात. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा पी. साईनाथ यांनी त्या-त्या गावात जाऊन अभ्यास केला आहे. त्यानंतर त्यांनी अभ्यासपूर्ण निरीक्षण नोंदवलंय. आपल्याला गवसलेले प्रश्‍न सरकारचा रोष ओढवूनही ते जाहीररित्या सांगतात, हे विशेष. जनतेला फक्त प्रश्‍नांचे गांभीर्य सांगतात असे नव्हे, तर त्याविरुद्ध सर्वसामान्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे, ही भूमिकाही घेतात. आपण लिहिलेली बातमी ज्या समाजघटकांची आहे. तो समाज ती बातमी वाचणारही नाही, त्याची साधी प्रतिक्रियाही आपल्याला मिळणार नाही, याची कल्पना असूनसुद्धा उपेक्षितांची बाजू मांडली पाहिजे. हे काम पत्रकारितेतील व्रत म्हणून ते करतात. समाजातील दुर्बलतेकडे निर्देश करते ती खरी पत्रकारिता, अशी सरळसोपी व्याख्या पी. साईनाथ करतात. गरिबांचे अधिकार आणि त्यांच्या हक्कांविषयी माध्यमांमध्ये अधिक वृत्तांत यायला हवा, अशी अपेक्षा ते बोलून दाखवितात. माध्यमे बातम्यांकडून आता करमणुकीकडे वळू लागली आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकीची पत्रकारिता हरवत चालली आहे. सामान्यांचे प्रश्‍न माध्यमांत उमटत नाहीत. तुम्ही मला सांगा, भारत हा कृषिप्रधान देश आहे, असं आपण म्हणतो, कृषिविषयक किती बातम्या माध्यमात दिसतात? कृषी क्षेत्राच्या बातम्या देणारे पूर्णवेळ किती बातमीदार आहेत? राजकारण, इंटरटेनमेंट, स्पोर्टस बीट पाहणारे पत्रकार आहेत, मग कृषी बीट पाहणारा बातमीदार का नाही? धांगडधिंगा करणाऱ्या कार्यक्रमाला "स्पॉन्सर' मिळतो म्हणून मीडिया पार्टनर म्हणून माध्यमे मिरवतात. शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी आणि उपेक्षित घटकांचे प्रश्‍न महत्त्वाचे नाहीत का? या बातम्यांना "स्पॉन्सर' मिळत नाही म्हणून या घटकांच्या बातम्या दाखवायच्या नाहीत का? एकता कपूरच्या मालिकांमध्ये विवाहबाह्य संबंधाविषयी दाखविले जाते, मग टी.व्ही.चा टीआरपी वाढतो. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न माध्यमांना गंभीर कसा वाटत नाही? याचे मला आश्‍चर्य वाटते. शेतकऱ्यांना पॅकेज दिले म्हणजे प्रश्‍न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांना ओपन हार्टची गरज आहे. त्यांना पॅकेज देऊन बॅंडेज लावले जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत कायमस्वरुपी उपाययोजना व्हायला हवी. कार्पोरेट क्षेत्राला मोठे कर्ज दिले जाते. मग, शेतकऱ्यांना कमी दराने कर्ज का दिले जात नाही? पेट्रोलचे भाव वाढवता ना, मग शेतकऱ्यांच्या धान्याला भाव देणार की नाही? म्हणून शेतकऱ्यांसाठी प्राईस स्टेबिलेशन फंड द्यायला हवा. शेतकऱ्यांच्या धान्याला निश्‍चित आणि योग्य दर मिळाला पाहिजे, तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असं साईनाथ सांगतात. शेअर मार्केट, रिलायन्स मार्केट नको आता शेतकऱ्यांचे मार्केट झाले पाहिजे हा व्यापक दृष्टीकोन साईनाथ मांडतात. म्हणून तर मला पी.साईनाथ यांचे लेखन प्रेरणादायक वाटते. पी.साईनाथ यांचा आणि माझा सुसंवाद झाला. त्यात मला सत्य उलगडले की पी.साईनाथ स्वतःसाठी जगत नाही. तो लोकांसाठी, लोकांच्या प्रश्‍नांसाठी, नाही रे...च्या वर्गासाठी....म्हणून तर एका सत्यासाठी, उपेक्षितांच्या घटकांसाठी साईनाथ यांची पत्रकारिता आहे. यातच या साध्या माणसाचे मोठेपण सामावले आहे. माध्यमातील जीवघेणी स्पर्धा, भांडवलशाही आणि व्यावसायिक "पॅकेज' पत्रकारितेच्या युगात माध्यमे आपले स्वत्व विसरत चालली आहेत का, असा प्रश्‍न पडतो. म्हणून तर पत्रकारिता ही सामाजिक बांधिलकी आहे, असं म्हटल्यावर आजच्या पिढीतील पत्रकार हसू लागतात, हे खरंही आहे म्हणा. आजूबाजूची पत्रकारिता "धंदेवाईक' होत असताना पी.साईनाथ यांची पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी आहे. साईनाथांची पत्रकारिता दीपस्तंभासारखी आहे. त्यामुळंच त्यांची पत्रकारिता मला आश्वासक वाटते.