Tuesday 14 December 2010

जिंदादिल दिग्दर्शक-सचिन कारंडे


सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधील सचिन कारंडे यानं अगदी सहावीत असतानाच दिग्दर्शक होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. म्हणतात ना...बाळाचे पाय पाळण्यात दिसतात...अगदी तसंच ते स्वप्न त्यानं उराशी बाळगलं, आणि ते प्रत्यक्षात आज उतरवलं. सचिननं "पे बॅक' नावाचा हिंदी चित्रपट काढला आहे. त्याचा आज मुंबईत प्रीमिअर होणार आहे. त्याचा हा पहिलाच चित्रपट...शाळेत असताना मनाशी ठरवलेली गोष्ट आज प्रत्यक्षात साकार होताना सचिनच्या डोळ्यात आनंदाश्रु येत आहेत. अहो, स्वप्न म्हणजे काय असतं, ते प्रत्यक्षात उतरवताना काय करावं लागतं, स्वप्न साकार झाल्यावर होणारा आनंद काय असतो, याचं उत्तर सचिनच्या प्रत्येक शब्दातून जाणवते.


सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये सचिन कारंडेचा जन्म झाला. वडील लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात. घरातील मंडळींचा चित्रपटाविषयी तसा काही संबंध नाही. गुरु वगैरे तस्सं कुणीच नाही. पण, लहानपणापासून सचिनला चित्रपटाची आवड होती. शाळेतील अभ्यासात सचिनने तशी फारशी चमकदार कामगिरी केली नाही. मात्र, चित्रपटातील गाणी त्याची तोंडपाठ असायची. गाणी तोंडपाठ मात्र अभ्यास सपाट असं सचिनचं असायचं. शाळेतील अभ्यासात तसा इतरांपेक्षा फार हुशारही नव्हता, आणि एकदम "ढ' विद्यार्थ्यांसारखाही नव्हता. गणितं, भूमिती किंवा इंग्रजीचा पाठ असला तरी सचिनचं गाणं ठरलेलं असायचं. शाळेत असताना प्र.के.अत्रे यांचं "वेड्यांचा बाजार' हे नाटक पाहिलं. म्हणतात ना...मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी तस्संच...सचिनला सहावीत असताना दिग्दर्शक होण्याची आवड होती. लहानपण तस्सं खेळायचं...बागडायचं..नाचायचं. पण, या गड्याला चित्रपटाचा भारी नाद...खरंच नाद असल्याशिवाय कुठलाही माणूस धडपडून, झपाटून काम करत नाही, हे सचिनचं पक्कं तर्कशास्त्र. अकलूजच्या सदाशिवराव माने महाविद्यालयात बारावीपर्यंत कॉमर्स शाखेतून सचिननं शिक्षण घेतलं. पुढे त्यानं पुण्याच्या ललित कला केंद्रात प्रवेश घेतला. नाट्यशास्त्रात 3 वर्षे खर्च केल्यावर त्याला खूप काही नवं शिकल्याचं समाधान मिळालं. त्या दरम्यान, त्याने वाचनाचा सपाटा सुरु केला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अच्युत गोडबोले यांची भाषणे ऐकून सचिन भारावून जायचा. त्याची "एनर्जी' एकाच ठिकाणी लागत होती. कुणाला डॉक्‍टर, इंजिनिअर, वकील व्हायचे होते. पण, याच पठ्ठ्याला दिग्दर्शक व्हायचे होते. बॉलीवूडमध्ये नाव कमवायचं असेल तर मुंबईत यायला हवं. यासाठी 2006 मध्ये सचिन मुंबईत आला. त्यानं अनेक कथा लिहिल्या. काही कथा अनुभवातून आल्या होत्या. त्याचं मन स्थिर राहतं नव्हतं. त्या अस्थिर मनातून अनेक कथांचा जन्म होत होता. नवे प्रयोग, नवी गृहितके मांडली जात होती. सचिनने थायलंडमध्ये "फ्लॅश' नावाची एक शॉर्टफिल्म बनविली. त्याला बॅंकाकमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला. मग, काय सचिनचे एकापाठोपाठ एक प्रयोग होत राहिले. बॅंकाकमधील काही भारतीयांनी...आयडिया अच्छा है सर...म्हणून सचिनला गौरविले. मग काय, सचिनच्या अंगात शंभर हत्तीचे बळ आले. नव्या उमेदीने सचिन कामाला लागला. चुका सुधारून नव्या प्रयोगाची आखणी करू लागला. सचिनच्या आयुष्यात आलेली एक कथा त्याने "पे बॅंक' मध्ये मांडली आहे. "पे बॅक' चित्रपटासाठी तब्बल 5 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सचिनचा जानेवारीत "विकल्प' नावाचा दुसरा हिंदी चित्रपट येतोय. जिद्दी आणि जिंदादिल दिग्दर्शक असलेल्या या मराठमोळ्या दिग्दर्शकाला अर्थात सचिनला त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा...